TOD Marathi

मुंबई | शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार रखडलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. परंतु अद्याप खातेवाटप झालेलं नाही. खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्तारावरून सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहेत. मंत्रीमंडळ विस्ताराचा तिढा सोडवण्यासाठी बुधवारी (१२ जुलै) अजित पवार व प्रफुल्ल पटेल हे दिल्लीत भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेले होते.

या दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर बोचरी टीका केली. जो माणूस इथे राजासारखं राहत होता, तो माणूस दिल्लीत सुभेदार बनायला चालला आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली. आव्हाडांच्या या टीकेला अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. अजितदादा कालही राजे होते, आजही राजे आहेत आणि उद्याही राजेच राहतील, असं अमोल मिटकरी म्हणाले.

हेही वाचा” ...फडणवीसांबाबत ‘कलंक’ हा शब्द योग्यच, कॉंग्रेस नेते अतुल लोंढेंचं वक्तव्य”

अमोल मिटकरी ट्वीटमध्ये म्हणाले, “दादा कालही राजे होते. आजही राजे आहेत आणि उद्याही राजेच राहणार. दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट कालही दरबारी हुजरे होते,आजही आहेत, आणि कायमस्वरुपी हुजरेच राहतील… #अंगुरखट्टेहै”